भारतरत्न,स्वरसम्राग्नी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांची कुठलीही ओळख करून देणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखे आहे.लता दिदींच्या भारतीय चित्रपट संगीतातील योगदान आणि पार्श्वगायनातील कसब त्यांना एक 'लिविंग लेजण्ड' बनवते.लहानपणापासून वडिलांकडून मिळालेल्या संगीत शिक्षणामुळे पार्श्वगायनात लता दिदींचा हाथ कुणीही धरू शकले नाही.परंतु गायनामुळे लहानपणी त्यांच्या अकॅडमीक शिक्षणावर परिणाम झाला आहे का?लता दिदींचे शिक्षण किती झालेले आहे?चला तर जाणून घेऊया लता मंगेशकर( Lata Mangeshkar Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त ही माहिती.
ज्या वयात मुलं मुली शाळेत जायला सुरुवात करतात त्यावयात लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षांपासून संगीताचे धडे घेण्यास सुरू केले होते.त्यासाठी लता दिदींना कुठे बाहेर जायची गरज नव्हती.त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar) एक नाटयकम्पनी चालवायचे जे स्वतः शास्त्रीय गायनात पारंगत होते.तसेच ते नाटकात अभिनय देखील करायचे.त्यांच्या घरी संगीत शिकण्यासाठी काही विद्यार्थी येत असत त्यामुळे अगदी लहानपणापासून लता दिदींच्या कानावर सूर पडत असत.अशातच लता दिदींच्या नकळतच त्या संगीताकडे आकर्षित झाल्या.स्वयंपाक घराच्या ओट्यावर बसून त्या आईला गाणे म्हणून दाखवत मात्र वडीलांसमोर त्या कधीही गाणे गात नसत.एकदा एका विद्यार्थ्याला शिकवत असतांना मास्टर दीनानाथ त्याला रियाज करायचा सांगून थोड्या वेळासाठी बाहेर गेले.त्याचा रियाज लहानगी लता घरातील कोपऱ्यात कुठेतरी बसून ऐकत होती.विद्यार्थी गायनात चुका करत आहे हे जाणवल्यानंतर न राहवल्या गेल्याने लता त्याच्याकडे जाऊन ते गाणे योग्य पद्धतीने गाऊन दाखवू लागली.गायन सुरू असतानाच मास्टर दीनानाथ तिथे आले व त्यांना पाहताच लता तेथून निघून गेली. मात्र दीनानाथ मंगेशकरांनी बाहेरूनच लता दिदींचे गाणे ऐकले होते.तेव्हा मास्टर दीनानाथ त्यांचा पत्नीला म्हणजे लता दिदींच्या आईला म्हणाले होते "आपल्या घरातच गवय्या आहे आणि मी लोकांना शिकवतो आहे"
लता दिदींना शाळेच्या पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचे मन तिथे रमू शकले नाही.त्यांच्यात बालपणीच असलेली नैसर्गिक गायनाची अभिरुची त्यांना खुणावत होती.त्यामुळे फक्त २ दिवस शाळेत बसल्यानंतर त्या पुन्हा कधीच शाळेत गेल्या नाही.एका पाकिस्तानी न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा स्वतः लता दिदींने केला आहे.दोन दिवस शाळेत गेलेल्या या विद्यार्थिनीला मात्र तिच्या असामान्य प्रतिभेने जगभरातील सहा विश्वविद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या आहेत.
काळाने लता मंगेशकर यांना पार्श्वगायन क्षेत्रातील नवोदितांसाठी अक्षरशः एक युनिव्हर्सिटी बनविले.लता दिदींचे प्रत्येक गाणे नवीन कलाकारांसाठी संगीत शिक्षणाचे एक स्तोत्र असते.असे व्यक्तिमत्त्व संगीत क्षेत्रात पुन्हा होणे नाही.आज लता मंगेशकर यांच्या ९२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या जात असून,चाहत्यांकडून त्यांच्या कार्याचा मनोमन उजाळा होत आहे.